रॅम्प त्वरित उभारण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्टसिटी योजनेंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांना जोडणाऱया संपर्क रस्त्यांवर रॅम्प बनवून वाहनधारकांना सोयीचे करणे बंधनकारक आहे. मात्र याकडे स्मार्टसिटी कंपनी आणि कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बीएसएनएल कार्यालयासमोर चर निर्माण होऊन वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच या रस्त्याला विविध संपर्करस्ते जोडले गेले आहेत. काँक्रिटीकरणामुळे खानापूर रस्त्याची उंची एक फुटाने वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक संपर्क रस्त्यावर रॅम्प निर्माण करून वाहनधारकांना सोयीचे करणे आवश्यक आहे. मात्र कंत्राटदाराने केवळ काही मोजक्मयाच रस्त्यांवर रॅम्प घातले आहेत. उर्वरित ठिकाणी रॅम्प नसल्याने वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. काही ठिकाणी माती घालून तात्पुरत्या स्वरुपात डांबराचा रॅम्प निर्माण करण्यात आला होता. मात्र सदर रॅम्प खराब झाला असून ठिकठिकाणी चरी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः कॅम्प परिसरात ही समस्या भेडसावत असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहे.
कॅम्प येथील इस्लामिया स्कूलकडे जाणाऱया रस्त्यावर पेट्रोलपंपच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर चरी निर्माण झाल्याने वाहनांचे अपघात घडत आहेत. तसेच बीएसएनएल कार्यालयाशेजारी भली मोठी चर निर्माण झाली आहे. लहान-मोठी वाहने ये-जा करताना या चरीमध्ये अडकत आहेत. तसेच दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे कॅम्प परिसरातील संपर्क रस्त्यावर रॅम्प निर्माण करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.