टॅक्सी मालकांचे सरकारला आव्हान- आंदोलनाने घेतले वेगळे वळण
प्रतिनिधी/पणजी
गोवा माईल्स रद्द करा, या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून येथील आझाद मैदानावर सुरू आहे. दरम्यान, टॅक्सी मालकांना शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास सरकारने नकार दिल्याने टॅक्सी मालकांच्या आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे. आमच्यामुळे करेनाची समस्या निर्माण होत असेल तर पॅसिनोंचे काय, असा प्रश्न टॅक्सी मालकांनी उपस्थित केला आहे. आता पॅसिनो बंद करा, आम्ही माघार घेतो, असे आव्हान टॅक्सी मालक संघटनेचे चेतन कामत यांनी सरकारला दिले आहे.
पॅसिनोत दर दिवशी हजारो लोक एकत्र येत असतात, पालिका निवडणुकीसाठी होणाऱया प्रचारातही तोच प्रकार दिसून येत आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देत आहोत, तर आमच्या आंदोलनामुळे समस्या निर्माण होण्याची भीती सरकारला वाटत आहे. वास्तविक सरकारला करोनाची समस्या निर्माण होणार याची भीती नव्हे तर आमच्या आंदोलनामुळे खुर्ची हलणार की काय याची भीती वाटत आहे. अजूनही मुख्यमंत्र्यांनी शहाणपणा दाखवून गोवा माईल्स रद्द करावे, अशी चेतावणीही कामत यांनी दिली आहे.
राज्यात वाढत्या करोनाची समस्या लक्षात घेऊन सरकारने परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून टॅक्सी मालकांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला असून दर दिवशी हजारो संख्येने लोक आझाद मैदानावर एकत्र येत असतात. त्यामुळे करोनाचा फैलाव होऊ शकतो म्हणून परवाना रद्द केला आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
परवाना मिळविण्यासाठी टॅक्सी मालकांनी जिल्हाधिकाऱयांना भेटण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांना जिल्हाधिकारी भेटलेच नाही. दुपारी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. टॅक्सी मालकांनी त्यांच्यासोबत जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळीही ते त्यांना भेटू शकले नव्हते.
…………………..
बॉक्स
… अन्यथा कायदा हातात घेऊ !
शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानावर कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टॅक्सी मालकांचे आंदोलन हे सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत असते. रोजच्या प्रमाणे टॅक्सी मालक शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर आले असता, त्यांना आझाद मैदानावर प्रवेश नाकारण्यात आला. टॅक्सी मालकांनी उग्ररूप धारण केले आणि सरकारच्या या निर्णयावर खरपूस टीका केली. घोषणाबाजीही करण्यात आली. लोकशाही मार्गाने शांततापूर्वक होत असलेल्या आमच्या आंदोलनावर सरकारने खो घालण्याचा प्रकार केला असून सरकारने लोकशाहीचा गळाच घोटला आहे. हे सरकार सर्वमान्य लोकांचे नसून काही मोजक्याच लोकांचे व परप्रांतीयांचे हित जपणारे सरकार आहे, अशी टीकाही टॅक्सी मालकांनी केली आहे. आंदोलनासाठी आझाद मैदान मोकळे करून द्या, अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारवरच असेल, असा इशाराही टॅक्सी मालकांनी दिला आहे.