गावाला पोलीस छावणीचे स्वरुप
प्रतिनिधी / सातारा :
वाई तालुक्यातील केंजळ येथे रात्रीत शिवभक्तांनी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. ही बाब काही ग्रामस्थांनी सकाळी पोलीस प्रशासनास कळवताच प्रशासन गावात दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे यांच्यासह वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी गावात डेरेदाखल झाल्याने दिवसभर तणाव होता. ग्रामपंचायत कार्यालयात गावचे सरपंच, उपसरंपच यांच्यासह ज्येष्ठ नागरिक यांच्यासमवेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी प्रशासनाची परवानगी घेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाबसवण्यास सांगितले. तर स्थानिक ग्रामस्थांनी पुतळा हटवण्यास विरोध केल्याने दिवसभर गावात तणाव होता.
वाई तालुक्यातील केंजळ येथे शनिवारी रात्री शिवभक्तांनी गावच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. सकाळी काही ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी व वाईच्या प्रशासनाच्यावतीने परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे सकाळीच गावात पोहचले. मोठा पोलीस फाटा गावात दाखल झाला. पोलीस अधीक्षक गणेश केंद्रे, तहसीलदार रणजित भोसले यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थांची बैठक बोलवली. या बैठकीमध्ये गावचे सरपंच, अपसरंपच यांच्यासह तरुण उपस्थित होते. पोलीस व प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना परवानगी घेणे गरजेचे आहे. तोपर्यंत पुतळा बसवू नये, अशी विनंती करण्यात आली. त्यावर स्थानिकांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. तो आता काढणार नाही, असा पवित्रा घेत काहींनी आपली भूमिका परखडपणे मांडली. त्यामध्ये उशीरापर्यंत चर्चा सुरु होती.
सायंकाळी गावात दंगा नियंत्रण पथक दाखल
पोलीस प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास परवानगी देण्यात येईल, तुर्तास पुतळा सुरक्षित स्थळी ठेवून परवानगी मिळाल्याने जाहीरपणे कार्यक्रम घेवून त्याची प्रतिष्ठापना करा, अशी विनंती करण्यात येत होती. परंतु ग्रामस्थांकडून एकदा बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्यात येणार नाही, याच भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी सायंकाळी दंगा नियंत्रण पथकास पाचारण केले. सांयकाळी उशीरापर्यंत वातावरण तणावपूर्ण होते.