मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
केंद्र सरकारने गोवा राज्यासाठी कदंब वाहतूक महामंडळाकरीता 100 इलेक्ट्रिक (ई) बसगाडय़ा मंजूर केल्या असून त्या लवकरात लवकर गोव्यात येतील यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सर्व वाहने इलेक्ट्रिक व्हावीत म्हणून धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यानी सुचित केले.
A पं. दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त भाजप पणजी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रदूषण रोखण्यासाठी आणि ते कमी व्हावे म्हणून त्या बसगाडय़ा महत्त्वाच्या असून त्या त्वरित उपलब्ध होणे गोव्यासाठी काळाची गरज आहे. यापूर्वी गोव्यात इलेक्ट्रिक बसगाडय़ा आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. तथापि ते यशस्वी झाले नाहीत परंतु आता या 100 बसगाडय़ा आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्राधान्य देईल, असे डॉ. सावंत यांनी नमूद करून त्याबद्दल केंद्रीय पर्यांवरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले.
म्हादईच्या क्षारतेची (सॅलिनिटी) चाचणी करणार
म्हादईच्या पाण्यातील सॅलीनिटीची चाचणी करण्यासाठी आपणच केंद्राला पत्र पाठवून सूचना केली असून एप्रिल-मे महिन्यात ती चाचणी करायची असते. तेव्हा केंद्राचे पथक येऊन ती चाचणी करेल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
तत्पुर्वी पं. दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि समई पेटवून त्यांना डॉ. सावंत यांनी आदरांजली अर्पण केली. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन भाजप पुढे जात आहे आणि जनतेची सेवा करीत आहे. आत्मनिर्भर समृद्ध गोंय करण्यासाठी 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात आणि गोव्यातही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहे. राज्यातही ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजना 2 ऑक्टोबरपासून चालू करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांचेही यावेळी भाषण झाले. भाजपचे पदाधिकारी त्याप्रसंगी उपस्थित होते.
बसकंपन्यांकडून पाच वर्षांची बँक हमी
दरम्यान, या अगोदर केंद्र सरकारने महामंडळाला 50 इलेक्ट्रिक गाडय़ा घेण्यास मान्यता दिली होती, त्यांचे सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आले आहेत. ज्या कंपनीकडून या गाडय़ा खरेदी केल्या जातील त्या कंपनीकडून बँक हमी घेण्यात आली आहे. या गाडय़ा प्रत्यक्षात वाहतुकीस लागेपर्यंत तसेच पुढील पाच वर्षापर्यंत बँक हमी कदंब महामंडळाकडे राहणार आहे, अशी माहिती कंदब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गावर धावणार बसगाडय़ा
प्रत्येक बस दर दिवसाला किमान 200 कि.मी. चालणे आवश्यक आहे. या सर्व बसेस राष्ट्रीय महामार्गावर चालविण्यात येतील. पणजी ते कारवार, पणजी ते पेडणे, पणजी ते मडगाव, पणजी ते म्हापसा या मार्गावर या बसगाडय़ा चालविण्यात येणार आहेत. या बसगाडय़ा महागडय़ा आहेत, त्यामुळे महामंडळाला त्याचा मोठा फायदा होणार नाही, मात्र पर्यावरणाचे संरक्षण करून प्रवासी वाहतूक सांभाळता येईल, असे घाटे यांनी सांगितले.