सात हजार कोटींच्या नव्या 23 विकासकामांना मंजुरी : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील रस्ता वाहतूक साधनसुविधा सुरळीत करण्यासाठी आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारने 22 हजार कोटी रुपये खर्च केले असून नव्या 23 कामांसाठी 7 हजार कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय भू पृष्ठ वाहतूक तथा महामार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. महामार्ग तयार करताना कुठलेच झाड कापले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोमवारी 726 कोटी रुपये खर्चुन पत्रादेवी ते पोळेपर्यत बांधलेल्या चार पदरी रस्त्याचे चार ठिकाणी उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले. पत्रादेवी, करासवाडा, नावेली आणि खोर्ली या चार ठिकाणी कार्यक्रम झाले. 516 कोटी खर्चुन एमपीटी गेटपर्यंत बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन झाले तसेच 201 कोटी रुपये खर्चुन बांधलेला पश्चिम बायपास मडगाव शहराबाहेरील बायपास रस्त्याचे उद्घाटन झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अजून सात हजार कोटींच्या कामांना मंजूरी
या व्यतिरिक्त अजून 7 हजार कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्याचा शिलान्यासही झाला. त्यात मोपा विमानतळ तर राष्ट्रीय हमरस्ता 66 पर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे बांधकाम तसेच दाबोळी विमानतळाबाहेर असलेली सिग्नल व्यवस्था बंद करुन तेथे फ्लाय ओव्हर बांधण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
झाडे ट्रान्सप्लांट करणार
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी किंवा नव्या रस्त्यासाठी झाडे कापावी लागणार नाहीत. मोठमोठी झाडे मुळापासून उपटून दुसऱया ठिकाणी लावण्याचे तंत्रज्ञान सध्या भारतात आहे. त्याचे प्रात्यक्षिकही आपण बघितले आहे. हे तंत्रज्ञान वापरुन झाडे स्थलांतरित केली जाणार व अतिरिक्त नवी झाडे लावली जाणार, पण यापुढे कुठलेच झाड कापले जाणार नाही, असे ते म्हणाले.
कदंबला पूर्णतः इलेक्ट्रिक होण्याची संधी
कदंब वाहतूक महामंडळासाठी गोवा सरकारने 100 इलेक्ट्रिक बसगाडय़ा घेतल्या आहेत. कदंब महामंडळास पूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाडय़ा घेण्यासाठी मदत करायला आपण तयार आहे. सर्व इलेक्ट्रिक बसेस असलेले देशातील पहिले परिवहन महामंडळ होण्याची संधी कदंब महामंडळाला मिळू शकते, असेही मंत्री गडकरी म्हणाले.
सरकारी गाडय़ा फक्त इलेक्ट्रिक
यापुढे सरकार डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱया गाडय़ा विकत घेणार नाही, असा संकल्प प्रत्येक राज्याने करावा असे ते म्हणाले. बॅटरीवर चालणाऱया गाडय़ापेक्षा हरित हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून त्याच्या वापरावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सहा प्रकल्पांची पायाभरणी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहा प्रकल्पांची पायाभरणी सोमवारी झाली. त्यासाठी 3 हजार 840 कोटी खर्च करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील पत्रादेवी ते करासवाडा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मडगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. करासवाडा ते बांबोळी रस्त्याचे काम पूर्ण झाले तसेच मुरगांव बंदराला जोडणारा पूल पूर्ण झाला त्याचे लोकार्पण झाले, अशी माहिती देताना मोपा विमानतळ जोडणारा रस्ता, झुवारी नदीवरील पुलावर निरीक्षण मनोरा व फिरत्या रेस्ट्रॉरंटची पायाभरणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नितीन गडकरी नव्हे ‘रोडकरी अथवा पुलकरी’..!
गोव्यातच नव्हे तर इतर राज्यांतही नितीन गडकरी यांनी रस्ते आणि पूल बांधले आहेत. ते पाहता त्यांचे नाव नितीन रोडकरी अथवा पुलकरी योग्य ठरेल, अशी प्रशंसनात्मक टिपण्णी केंद्रीय पर्यटनराज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केली.