प्रतिनिधी/ बेंगळूर
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उत्तर कर्नाटकासह राज्यातील काही भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कर्नाटकाला तातडीने 10 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज द्यावे, अशा विनंतीचे पत्र मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या सविस्तर पत्रामध्ये राज्यात पूर आणि पावसामुळे 21,609 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. जीवित-वित्तहानी झाली असून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे घरे गमावलेल्यांच्या मदतीसाठी आर्थिक साहाय्य आवश्यक असून राज्याला तातडीने 10 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर करावे, अशी विनंती केली आहे.
आपण स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून वस्तूस्थितीची माहिती जाणून घेतली आहे. जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून माहिती घेतली आहे. मंत्री आणि जिल्हा पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत, असा उल्लेखही केला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांच्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. शिवाय घरांची हानी झालेल्यांना देखील मदत दिली जात आहे. मागील वर्षी देखील पुराचा फटका बसला असून त्यातून जनतेला सावरण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज घोषित करण्याची विनंती येडियुराप्पा यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. शिवाय 15 सप्टेंबरनंतर झालेल्या नुकसानीबाबतची माहिती ऑक्टोबर अखेरीस सादर करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केला आहे.