भाजपविरोधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा नारा : सोनिया गांधी, ममता बॅनर्जी सक्रिय : जीएसटी, नीट-जेईईवरून विविध प्रश्न उपस्थित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुढील अध्यक्ष निवडेपर्यंत पक्षाध्यक्षपद अबाधित राहिल्यानंतर सोनिया गांधी पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. बुधवारी त्यांनी विविध मुद्दय़ांच्या अनुषंगाने सत्ताधारी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे चार आणि इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री बैठकीत जीएसटी नुकसान भरपाईच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना जीएसटीचा निधी न मिळणे म्हणजे विश्वासघात आहे असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 11 ऑगस्ट रोजी झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने यावषी आपल्याला 14 टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणे शक्मय नसल्याचे स्पष्ट केले होते. हा नकार म्हणजे मोदी सरकारने राज्यांचा केलेला विश्वासघात असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.
नीट-जेईईसंबंधी कोर्टात आव्हान देऊया : ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नीट-जेईई परीक्षेचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत कोरोना संसर्गाची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे करायला हवी, असे त्या म्हणाऱया. या परीक्षेप्रश्नी राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित घोषणांमुळे आपल्याला चिंता वाटली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या इतर समस्या आणि परीक्षा यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असून बेजबाबदारपणे हाताळले जात आहे. असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.
जेईई-नीट परीक्षा घेण्यासाठी दबाव : शिक्षणमंत्री
राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा घेण्यावरुन केंद्र सरकारवर टीका होत असतानाच परीक्षा ठरल्या वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सतत विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत असून त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही निशंक यांनी सांगितले. जेईई परीक्षा देणाऱया 80 टक्के उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. जेईई परीक्षेसाठी साडेआठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामधील 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहे.
…बैठकीला यांची उपस्थिती!
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आमंत्रित केलेल्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी अमरिंदर सिंग, अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि व्ही. नारायणसामी यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सर्व नेत्यांनी आपापल्या राज्यातील स्थितीला अनुसरून विविध मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. बैठकीमध्ये जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्यांवरही चर्चा झाली.
घाबरायचं नाही, लढायचं : उद्धव ठाकरे
या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधाऱयांशी लढायचं की त्यांना घाबरून रहायचं हे आधी आपण सर्वांनीच ठरवलं पाहिजे, असा टोमणा मारला. मी लढणाऱया बापाचा मुलगा असून एकदा पुढे टाकलेले पाऊस मागे घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. उद्धवजी तुम्ही कोरोना संसर्गाशी खूपच चांगल्या पद्धतीने लढत आहात, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
एकजूटीने काम करणे आवश्यक
देशातील विरोधी पक्ष कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे. मात्र, तेच होताना दिसत नाही, असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले. जीएसटीच्या मुद्यावर केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. केंद्र सरकार केवळ त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या पक्षांना मदत करत असताना इतर राज्यांना ठेंगा दाखवत असल्याचा आरोप सोरेन यांनी केला. या मुद्दय़ावरही आवाज उठविण्याची तयारी सर्वांनी दर्शवली.