ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मागील काही दिवसांपासून फरार आहेत. ते सध्या बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. महासंचालकपदाचा माणूस जेव्हा देशाबाहेर जातो, तेव्हा तो केंद्राच्या पाठिंब्याशिवाय जाऊ शकत नाही, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांची झालेली अटक ही दुर्दैवी आहे. देशमुख यांच्यावर आरोप करणारे लोग पळून गेले नसून, त्यांना पळून लावलेले आहे. महासंचालकपदाचा अधिकारी देशाबाहेर पळून जातो तो केंद्राच्या पाठिंब्यानेच जाऊ शकतो. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनुसार केंद्रीय तपास यंत्रणा अटक करते. चौकशी तपास होऊ शकतो मात्र, पहिल्याच भेटीत देशमुखांना अटक करणे चुकीचे आहे. हे नितिमत्तेला धरुन नाही.
भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे. भाजपच्या लोकांच्या प्रॉपर्टीज सगळ्या वैध मार्गाने आहे का?, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.