‘कोल्हापूर उत्तर’चे भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा वचननामा प्रसिध्द
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरासाठी काय करणार हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्यातून जाहीर करण्यात आले आहे. विरोधकांकडून मांडणी होतेय की, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना हे कसा काय विकास करु शकतात? तर यासाठी राज्यातील सरकारची आवश्यकता नाही. केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्या माध्यमातून शहरात विविध योजनांच्या माध्यमातून विकास करु, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्याप्रसंगी ते बोलत होते.
उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्याचे प्रकाशन आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, माधव भंडारी, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
केशव उपाध्ये म्हणाले, डिजिटल स्वरुपाचा हा वचननामा नागरिकांशी चर्चा करुन तयार करण्यात आला आहे. या वचननाम्यात नुसत्या घोषणा नाहीत, तर आम्ही काय करणार हे सांगितले आहे.
आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित कदम यांचा वचननामा डिजिटलच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे वेगळी मांडणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु विरोधकांकडून अशी मांडणी होतेय की, भाजपचे राज्यात सरकार नाही तर ते विकास कसा करणार? तर याला उत्तर म्हणजे केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातेल अनेक योजनांसाठी केंद्र सरकारचाच पैसा येतो. तसेच राज्यात आमचे सरकार असतानाही सरकारच्या पैशाऐवजी लोकसहभागातून रस्ते दुभाजक सुशोभिकरण, चौक सुशोभिकरण, पोलीस उद्योन सुशोभिकरण विकसित केले. आता केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातील.ते पुढे म्हणाले, सत्यजित कदम विजयी झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून विमानतळ, रेल्वेचा आढावा घेऊन केंद्र सरकार पातळीवर पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर शेतकर्यांच्या मालासाठी किसान रेलसाठी प्रयत्न करुच, परंतु कार्गो हबच्या माध्यमातून विमानातून जाण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. ड्रायपोर्टसाठीही प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर रस्ते दुभाजक नीट करणे, फिरते वाचनालय करणे, पुराच्या पाण्याने वाहतुक ठप्प होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल बांधणे, प्रदुषण थांबविण्यासाठी तसेच के.एम.टी.चे उत्पन्न वाढण्याठी 100 इलेक्ट्रीक बस आणण्यासाठी प्रयत्न, तसेच शहरातील सर्व चौकात चार्जींग स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न, गॅस पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
शाहू जन्मस्थळासाठी 13 कोटी भाजपने दिलेत
शाहू जन्मस्थळासाठी चंद्रकांतदादांनी काय केले, या खा. अमोल कोल्हे यांच्या आरोपाबाबत विचारणा केल्यावर, आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, शाहू जन्मस्थळासाठी भाजप सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 कोटी दिले आहेत.