प्रतिनिधी/ फलटण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली 7-8 वर्ष देशात सर्वत्र विकासाची कामे सुरु आहेत. केंद्र सरकार विकासाची कामे करत असताना महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकार केंद्राच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण करीत असल्याची टिका केंद्रिय राज्यमंत्री देवीसिंह चौहान यांनी केली.
केंद्र सरकार अंतर्गत फलटण येथे आयोजित ‘शायनिंग महाराष्ट्र महा प्रदर्शना’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर होते. याप्रसंगी ऍड. जिजामाला नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, सोलापूर भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप विकास करणारा देशातील सताधारी पक्ष आहे. कोरोना अथवा अन्य संकटाच्या काळात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. अशा कामांची प्रशंशा करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम करीत आहे. सत्ता येईल जाईल, मंत्रीपद आज असेल उद्या नसेल, मात्र भाजप पक्ष सातत्याने करणारा पक्ष आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर संसदेत आल्यापासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आहेत. फलटण येथे केंद्र अंतर्गत पोस्ट ऑफीस, पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वीत करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत यासाठी मी स्वतः त्यांना मदत करणार असल्याचे केंद्रीयमंत्री चौहान यांनी सांगितले.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, केंद्राच्या विविध योजना आज ग्रामीण भागापर्यंत पोहचत असून ग्रामीण विकासाची चक्रे भाजपनेच गतीमान केली आहेत. खा. रणजितसिंह यांनी या भागाच्या विकासासाठी करोडो रूपयांचा निधी केंद्रातून आणला त्या निधीतून विकास पर्व सुरू झाल आहे. आगामी सर्व निवडणूका जिह्यात पूर्ण क्षमतेने लढू जिह्यात दोन आमदार, दोन खासदार भाजपचे आहेत. भविष्यात आठ आमदार भाजपचेच असतील, यासाठी मी आणि खासदार प्रयत्नशील राहणार आहे.
खासदार रणजितसिंह म्हणाले, शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन अनेकांना उपयुक्त ठरले असून सुमारे पन्नास हजार लोकांना याचा लाभ घेतला आहे. असे प्रदर्शन प्रत्येक तालुक्यात भरविण्याचा आपला मानस आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत येत असून विकासाची कामे होत आहेत. आपल्या मतदारसंघात पायाभूत सुविधाचा विकास युध्दपातळीवर केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. मी दोन पिढय़ाचा संघर्ष पाहिला असून मला संघर्ष नवीन नाही, कोणी किती अडचणी आणल्या तरी त्याला मी घाबरणारा नाही. संसदेत गेल्या गेल्या महाराष्ट्रातील मातब्बर व्यतीला मी घाबरत नसल्याचे सांगितले.