केरकलमट्टी येथे निराणी उद्योग समूहाच्या नूतन कारखान्याचे उद्घाटन
वार्ताहर / जमखंडी
देशातील 9 कोटी शेतकऱयांना 134 कोटी रुपये साहाय्यधन दिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार शेतकऱयांना समर्पित असलेले सरकार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. बदामी तालुक्यातील केरकलमट्टी येथे निराणी उद्योग समूहाच्या नूतन कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांना चांदीची गदा, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शहा पुढे म्हणाले, देशाचा शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी जलसिंचन योजनेला प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. गत 70 वर्षात 370 कलम हटविण्याचे कोणीही धाडस केले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने ते धाडस करून काश्मीरला कायमस्वरुपी भारताला जोडले. इथेनॉल उत्पादनात वाढ व वापर याला केंद्र सरकार प्रोत्साहन देत असून पेट्रोलला इथेनॉल पर्याय ठरत आहे. साखर उत्पादनासह इथेनॉलचेही उत्पादन केल्यास शेतकरी व कारखानदारांना याचा लाभ होणार आहे. तसेच इथेनॉलचे उत्पादन वाढल्याने देशात पेट्रोलच्या आयातीमध्ये कपात होऊन देशाची आर्थिक सुधारणा होत आहे. निराणी उद्योग समूहाने विस्तार वाढविल्याने नवे 10 हजार उद्योग येणार असून बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. इथेनॉलवरील 15 जीएसटीमध्ये कपात करून ती 5 टक्के केल्याचीही माहिती शहा यांनी दिली.
कर्नाटकातील येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वातील सरकारने केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजना अंमलात आणून शेतकऱयांच्या बाजूने सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच आता देशाची आत्मनिर्भर भारतकडे वाटचाल सुरू असल्याचेही शहा यांनी सांगितले.
कर्नाटकात मोठे उद्योग सुरू करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत असून वरुणराजाच्या कृपेने आगामी 2 वर्षात पाण्याची कमतरता भासणार भासणार नसून उत्पादन वाढीस मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले.