कोलकाता / वृत्तसंस्था
भाजपने देशाला अंधःकारात नेल्याचा घणाघात करत भाजप जोपर्यंत केंद्राच्या सत्तेतून बाहेर जात नाही, तोपर्यंत ‘खेला होबे’ सुरूच ठेवणार असल्याचा स्पष्ट इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिला. शहीद दिवसाच्या निमित्ताने एका व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. दरम्यान, याप्रसंगी ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस हेरगिरीच्या मुद्यावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला.
टीएमसी पक्षाच्या निर्मितीपासूनच दरवषी 21 जुलैला शहीद दिवस साजरा केला जातो. यानिमित्त ममता बॅनर्जी यांनी बुधवारी टीएमसी कार्यकर्त्यांना व्हर्च्युअली संबोधित केले. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून जनतेने भाजपला नाकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बंगालच्या जनतेने ‘मा, माटी आणि मानुष’ची निवड करत अर्थशक्तीला नाकारले आहे. भाजप हुकूमशाहीवर उतरल्यामुळे आता मोदी सरकारला केंद्रातूनही हद्दपार करावे लागेल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत हे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास आतापासूनच आपल्याला काम सुरू करावे लागेल, असे ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या. मतदानानंतर राज्यात कसल्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. मतदानाच्या बरोबर आधी, ते आमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकत होते, आम्हाला माहीत आहे. आता जोवर भाजपला सत्तेतून काढत नाही, तोवर ‘खेला होबे’ सुरूच ठेवणार असल्याचे ममतांनी स्पष्ट केले.
सरकार पेगॅससच्या माध्यमाने हेरगिरी करत आहे. हेरगिरीसाठी पैसे खर्च करत आहे. यांत मंत्री आणि न्यायाधिशांचे नंबर टाकले जात आहेत. मात्र, याचा आम्हाला काही फरक पडत नाही. या केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकले पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल. कुणावरच विश्वास राहिलेला नाही. केंद्र सरकारमध्ये देखील त्यांच्या मंत्र्यांचे फोन देखील हॅक केले जात आहेत’’, असे त्या म्हणाल्या.