शिराळा / प्रतिनिधी
ऊसाच्या किमान आधारभूत किंमतीचा विचार करून, त्याप्रमाणे साखरेची देखील आधारभूत किंमत ठरवण्यात यावी. केंद्र सरकारने साखरेला प्रति क्विंटल ३५०० रूपये दर निश्चित करावा. सरकारने साखर उद्योगाला मदतीचा हात देणे गरजेचे आहे. अशी मागणी विश्वास सह. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. ते कारख्याच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ही सभा चिखली (ता. शिराळा) येथे गणेश मंदिर चिंतन मंडपात ऑनलाईन घेण्यात आली.
गेल्या वर्षभरात देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला मागणी नसल्याने लाखो क्विंटल साखर गोदामात पडून आहे. गतवर्षीची २ लाख २४ हजार तर या वर्षाची ५ लाख ७८ हजार क्विंटल अशी एकूण आठ लाख दोन हजार क्विंटल साखर गोडावूनमध्ये शिल्लक आहे. विश्वास कारखान्याने २६६१ रुपये प्रति क्विंटल दराने एक लाख २५ हजार क्विंटल साखर निर्यात केली. त्यास प्रति क्विंटल ६०० रुपये केंद्र सरकारकडून अनुदान मिळाले. त्यामुळे एकूण प्रति क्विंटल ३२६१ रुपये दर मिळाला. निर्यातीमुळे करखान्याचे कर्ज व त्याचे व्याज फेडण्यास हातभार लागला. सरकाने उसाची एफ. आर. पी. पाहून साखरेचा दर ठरवणे गरजेचे आहे. प्रति क्विंटल ३५०० रुपये दर मिळाला तर साखर उद्योगाच्या अडचणी कमी होतील, असे मानसिंग नाईक यावेळी म्हणाले.