वार्ताहर/ जमखंडी
केंद्र सरकार नोकरवर्गाला देत असलेल्या वेतनाप्रमाणे राज्य सरकारने वेतन द्यावे. यात कोणताही भेदभाव करू नये, असे मत राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष षडाक्षरी यांनी व्यक्त केले. जमखंडीत बसव भवनमध्ये आयोजित जमखंडी, रबकवी-बनहट्टी तालुका नोकर संघाच्या संमेलनात ते बोलत होते. प्रारंभी भारती मदीना यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तालुका अध्यक्ष पी. जी. अज्जन्नवर यांनी स्वागत केले.
षडाक्षरी पुढे म्हणाले, अनेक कारणे देत राज्य सेवानिवृत्त नोकरांना पेन्शन देण्यास विलंब करण्यात येत आहे. 2006 नंतर भरती केलेल्या कर्मचाऱयांना पेन्शन देण्यात येणार नसून कोटय़वधी रुपये सरकार बचत करीत असल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला. तसेच 17-18 वे पे कमिशन वेतन समितीची रचना करावी. प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम परत सुरू करावा, कोविड-19 ने बाधित होऊन मृत्यू पावलेल्या सरकारी नोकरवर्गाच्या कुटुंबाला 30 लाख रुपये परिहार निधी द्यावा, अशा अनेक मागण्यात त्यांनी केल्या.
तालुकास्तरीय संघटना करण्याचा उद्देश असून राज्यातील 75 विविध खात्यातील 5 लाख 40 हजार नोकर असलेली ही मोठी संघटना आहे. संघटनेच्या मागण्या सरकार पुढे मांडून त्यांना मान्यता मिळविण्याची जबाबदारी संघटनेची असल्याचेही षडाक्षरी म्हणाले. दरम्यान, संघटनेचे पदाधिकारी जगदीशगौडा पाटील, मल्लिकार्जुन बळ्ळारी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुधिंद्र राव, शिवरुद्रय्या, मोहनकुमार, सुरेश, कृष्णा, जयकुमार शेट्टी, एच. के. हिरेमठ, जी. आर. हनगंडी, पी. ए. अंमलझरी, महेश बागलकोट, एम. सी. हंचनाळ, विठ्ठल वालिकार, बी. टी. गौडर, शिवानंद मंगन्नवर, जी. बी. केरुर आदी उपस्थित होते. बी. आर. हनगंडी यांनी प्रास्ताविक केले. शंभू काई यांनी आभार मानले.