वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सेवेवर असताना कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्याच्या स्थितीशी निगडित एका नियमात केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. हा बदल मृत कर्मचाऱयाच्या कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्या नियमानुसार सेवेवर असताना कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास मिळणारी भरपाई नॉमिनी (वारस) असलेल्या कुटुंबियालाच देण्यात येणार आहे. म्हणजेच नॉमिनी म्हणून अधिकृत असलेला व्यक्तीच भरपाईस पात्र असेल. आतापर्यंत याप्रकरणी नॉमिनी नियुक्त करण्याचे बंधन नव्हते.
केंद्रीय कर्मचाऱयाने नॉमिनी नियुक्त केला नसल्यास भरपाईची रक्कम कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये समान स्वरुपात वाटली जाणार आहे. सरकारी कर्मचारी पेन्शन, पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये नॉमिनी ठरवत असतात. पण सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास मिळणाऱया भरपाईसाठी नॉमिनी ठरविण्यात आलेला नसतो. आता सरकारने परिपत्रक काढून यासंबंधी दिशानिर्देश दिले आहेत.
भरपाईसंबंधी देखील कर्मचारी आता नॉमिनी ठरवू शकतात. कर्मचाऱयाचा मृत्यू सेवेवर असताना झाल्यास त्याच्यानंतर भरपाईची रक्कम कुटुंबातील कुठल्या सदस्याला देण्यात यावी हे याद्वारे निश्चित होणार आहे.
याप्रकरणी केवळ कुटुंबातील सदस्यालाच नॉमिनी करता येणार आहे. भरपाईच्या रकमेसाठी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला नॉमिनी करता येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद आहे. याचबरोबर सरकारने भरपाईच्या देयकासंबंधी नामांकनाला सामील करण्यासाठी सीसीएस (पेन्शन) नियम, 1972 सोबत संलग्न अर्जाच्या स्वरुपातही दुरुस्ती केली आहे.