महागाई भत्त्यासंबंधीचा निर्णय पुढील आठवडय़ात शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकारी कर्मचाऱयांना पुढील आठवडय़ात होणाऱया होळी सणादरम्यान आनंदाची बातमी मिळण्याची शक्मयता आहे. त्यांच्या पगारात भरघोस वाढ होण्याचे संकेत सध्या मिळत आहेत. प्रसारमाध्यमांना प्राप्त माहितीनुसार, सरकार होळीपूर्वीच म्हणजेच 16 मार्चदरम्यान महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. याशिवाय, जुलै 2022 मध्ये पुन्हा महागाई भत्त्याचा आढावा घेतला जाणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, कर्मचाऱयांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता जाहीर केला जातो. यावेळी 16 मार्च रोजी होणाऱया मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. सध्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे वाढ जाहीर झालेली नाही. तसेच बुधवारी झालेल्या बैठकीतही यात निर्णय न झाल्याने आता पुढील आठवडय़ात यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱयांचा महागाई भत्ता जानेवारी 2022 पासून वाढवला जाणार होता. परंतु आता सरकार 16 मार्च रोजी डीए वाढवण्याची घोषणा करू शकते असे मानले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱयांना 31 टक्के महामार्ग भत्ता मिळतो, त्यात 3 टक्क्यांनी वाढ करून तो 34 टक्क्यांवर नेण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
मिळणार थकबाकीचे पूर्ण पैसे
केंद्रीय कर्मचाऱयांना मार्च महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम होळीनंतर दिली जाण्याची शक्मयता आहे. होळीनंतर कर्मचाऱयांना मागील दोन महिन्यांचे सर्व पैसे मिळतील. त्यानुसार मार्चमध्ये दोन महिन्यांची थकबाकी मिळाल्यास केंद्रीय कर्मचाऱयांची होळी धुमधडाक्यात साजरी होऊ शकते.