प्रतिनिधी / कोल्हापूर
देशात एफआरपीचे तीन तुकडे करण्याची चर्चा सुरु असताना शाहू कारखान्याने एकरकमी एफआरपीची घोषणा करुन त्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे शेतकर्यांच्या मनातील संभ्रमही दूर झाला आहे. याबद्दल शाहू कारखान्याला धन्यवाद देतो, अशा शब्दात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कारखान्याचे अभिनंदन केले आहे. शाहूचे प्रमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मंगळवारी दिल्ली येथे मंत्री तोमर यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये शेती संबधी विविध विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली.
कृषी मंत्रालय राबवत असलेल्या योजना जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहू समूह केंद्र सरकार बरोबर कार्य करण्यास इच्छुक असल्याचे समरजीत घाटगे यांना सांगितले. शाहू समूहाला भेट देण्याची विनंती तोमर यांना केली. यास त्यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित अधिकार्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून लवकरच भेट देण्याचे मान्य केले.
केंद्र शासन आणि शाहू समूहाने एकत्र येऊन या योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले, तर नक्कीच अधिकाधिक शेतकर्यांना योजनांचा लाभ घेता येईल. शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. केंद्र सरकारच्या प्रयत्नांना साथ देत त्यांच्या कल्याणासाठी आणि विकास साधण्यासाठी शाहू समूह कायम प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही समरजीत घाटगे यांनी तोमर यांना दिला.