ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
केंद्र सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी यांच्यातील द्वंद्व सर्वश्रृत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून भाजप नेत्यांना टार्गेट केले जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव आडसूळ यांच्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या आहेत. त्यावर संजय राऊत यांनी आज भाष्य करत भाजपवर टीकास्त्र सोडले.
राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राला लक्ष्य करीत आहेत. त्यांना महाराष्ट्रात टार्गेट दिले असून शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांत भाजपने मिळवलेल्या विजयाचा उन्माद मांडून नये. तसेच गोव्यातही निवडणुका जिंकल्याचा टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात नाही. तेथील परिस्थिती खूपच वेगळी आहे. तिथे पक्ष नाही तर व्यक्ती जिंकते. त्यामधील काही व्यक्ती सरकार बनवतात, असाही टोला यावेळी राऊत यांनी लगावला.