प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेची निवडणूक पारदर्शकपणे झाली नाही, असा आरोप करण्यात आला होता. याबाबत आयोगाकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जी तक्रार दाखल झाली त्याची दखल आयोगाने घेतली आहे. या तक्रारीची नोंद करून त्याबाबत निश्चितच निर्णय देण्याचे आश्वासनाचे पत्र पाठविण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पियुष हावळ यांनी महापालिका निवडणुकीच्या विरोधात तक्रार केली होती. त्या तक्रारीची पोचपावतीचे पत्र हावळ यांना आले आहे. बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. अनेक ठिकाणी गैरप्रकार घडले आहेत. ही निवडणूक गोंधळाच्या वातावरणात पार पडली असून पारदर्शकपणे झाली नाही. तेव्हा या निवडणुकीबाबत सखोल चौकशी करावी आणि नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी आयोगाकडे त्यांनी केली होती. त्याची दखल घेत हे पत्र पाठविण्यात आले आहे.