प्रतिनिधी/ पणजी
शाळांमधील 80 टक्के शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱयांना रोज निवडणूक प्रशिक्षणवर्गाला बोलावण्यात आल्याने मुख्याध्यापक संघटनेने त्याची गंभीर दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाला त्वरित दखल घेण्याची विनंती केली आहे.
निवडणुकीचे कार्य करण्यास सर्व शिक्षक सदैव तयार आहेत. पण प्रशिक्षणाच्या नावाखाली शाळांचा कामावर परिणाम होता कामा नये, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. ज्या मुख्याध्यापकांना बोर्ड परीक्षेची प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांनाही बोर्डाची परीक्षा चालू असताना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले आहे.
सावळागोंधळ सोडवण्यासाठी येत्या सोमवारी तातडीची बैठक घेऊन मुख्याध्यापकांना विश्वासात घ्यावे, अशी विनंती मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.