दापोली / प्रतिनिधी
येथील नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयात इ मेल द्वारे केलेल्या तक्रारी नंतर शुक्रवारी केंद्रीय पाहणी पथक पुन्हा उत्तर रत्नागिरी दाखल झाले. त्यांनी दापोली तालुक्यातील चक्रीवादळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
दुपारी येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या डॉ. स्वामिनाथन सभागृहात या पथकाची प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यानंतर त्यांनी दापोलीचा दौरा केला. दोन दिवसांपूर्वी या पथकाने केवळ
गाडीत बसून नुकसानीची पाहणी केल्याचा आरोप बागायतदारांनी केला होता. यामुळे शुक्रवारी पुन्हा आलेल्या या पथकाने आंजर्ले, पाजपंढरी, हर्णे, मुरूड, कर्दे आदी नुकसानग्रस्त सागरीकिनारी असणाऱ्या गावांचा दौरा केला.
यावेळी त्यांनी घरांच्या झालेल्या पडझडीची पहाणी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले पंचनामे बागायतदारांच्या बागांचे झालेले पंचनामे व घरांचे पंचनामे हे बरोबर आहेत का याची देखील त्यांनी खात्री केली. तसेच येथील ग्रामस्थांना केंद्राकडून जास्तीत जास्त व लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील या पथकाने ग्रामस्थांना दिले.
या दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्ह्याधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार समीर घारे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते
या दौऱ्यामध्ये केंद्रीय पथकाचे प्रमुख ॲडमिनीस्ट्रशन आणि सीबीटीचे सहसचिव एनडीएमए, एमएचए, नवी दिल्लीचे रमेश कुमार गांता असतील. त्यांच्यासोबत वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल, ऊर्जा मंत्रालयाचे एन.आर.एल.के. प्रसाद, ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव एस.एस.मोदी, उपसचिव, कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, रस्ता वाहतूक मार्ग विभागाचे मुख्य अभियंता आंशुमली पथकात असभागी आहेत.