पुन्हा फेरबदलाचे वारे : सिंधिया, सुशील मोदी, नारायण राणेंसह 27 संभाव्य नेत्यांची नावे चर्चेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरसंबंधी सर्वपक्षीय बैठक आटोपल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाला पुन्हा एकदा वेग आला आहे. मंत्रिमंडळात फेरबदलात ज्योतिरादित्य सिंधिया, सुशील मोदी, सर्वानंद सोनोवाल, नारायण राणे आणि भूपेंद्र यादव यांच्यासह 27 संभाव्य नेत्यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नजिकच्या काळात मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास 2019 मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच मोठा बदल ठरणार आहे.
नरेंद्र मोदी सरकारमध्ये शपथविधी होणाऱया मंत्र्यांमध्ये आता मध्यप्रदेशातील माजी दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे. तसेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, राजस्थानमधून भूपेंद्र यादव आणि मध्यप्रदेशमधून कैलाश विजयवर्गीय यांच्यासह भाजपचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक चेहरा सय्यद जफर इस्लाम देखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याच्या तयारीत आहेत. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याव्यतिरिक्त बीडमधील खासदार प्रितम मुंडे यांची नावेही चर्चेत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देव सिंह, पंकज चौधरी, वरुण गांधी आणि अनुप्रिया पटेल अशी चार नावे पुढे आली आहेत. राज्यसभेचे खासदार अनिल जैन, ओडिशाचे खासदार अश्विनी वैष्णव आणि वैजयंत पांडा, पश्चिम बंगालचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचा समावेश होण्याची संभावनाही व्यक्त केली जात आहे. दिल्लीतून खासदार मिनाक्षी लेखी यांच्या गळय़ातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मित्रपक्षांनाही सामावून घेणार
बिहारमधील राजकीय उलथापालथीनंतर चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱया पशुपती पारस यांना एलजेपीकडून संधी मिळण्याची शक्मयता आहे. त्याचप्रमाणे जेडीयूतर्फे आर.सी.पी. सिंग आणि संतोष कुमारही या यादीत आहेत. कर्नाटकमधून राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर यांना संधी मिळू शकते.