ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात गेल्या पाच दिवसात ४ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. नोव्हेंबरपासून इंधन दरवाढ झालेली नव्हती. देशातील पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यावर देशात इंधन दरवाढ होईल असा अंदाज व्यक्त केला होता. पण रशिया- युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर वाढल्याचे बोलले जात आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी इंधन दरवाढीचं समर्थन केलं. मागील पाच दिवसांमध्ये इंधनाचे दर चारदा वाढले असतानाच गडकरींनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा संदर्भ दिलाय. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे तेलाचे दर वाढले असून या युद्धाचा मुद्दा हा भारत सरकारच्या नियंत्रणातील नसल्याचं गडकरी म्हणालेत.
दरम्यान, शुक्रवारी एबीपी नेटवर्कच्या ‘आयडीयाज ऑफ इंडिया’ या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरी यांनी इंधन दरवाढ आणि इतर राजकीय विषयांवरही भाष्य केलंय. सध्या देशात इंधन दरवाढीवर ते म्हणाले, “देशामध्ये ८० टक्के तेल आयात केलं जातं. सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यावर आपण काहीच करु शकत नाही,” असं गडकरींनी म्हटलंय. इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या नियोजनासंदर्भात नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलंय.
देशात मागील पाच दिवसांमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ३ रुपये २० पैशांनी वाढलेत. चारही वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले आहेत. दरम्यान, आजही इंधनाचे दर ८० पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. नोव्हेंबरपासून पहिल्यांद २२ मार्च रोजी इंधनाचे दर वाढले. ८० पैसे प्रति लिटरने ही इंधन दरवाढ झाली.