मुंबई/प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआय ने छापा टाकल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संजय राऊत यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असं तिला वाटतं. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केले तर आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना खडसावलं आहे.
‘काहीजण सुपात, काही जण जात्यात’
माजी मंत्री चंद्रकांत पातळ यांनी यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. अनिल परब यांच्यावरही अनिल देशमुखांइतकाच गंभीर आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ऑन पेपर त्यांच्यावर हा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले.
याशिवाय, सचिन वाझेच्या पत्रात संजय घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे. त्यामुळे संजय घोडावत यांचीही केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच मला थेट अजित पवार यांचं नाव घ्यायचं नाही. मी केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, एवढंच म्हणत आहे. काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.