काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा भाजपवर घणाघात
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे भ्रष्टाचाराने पोखरून निघाले आहे. राज्यातील मंत्रीच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधू लागले आहेत. त्यामुळे लवकरच या सरकारला पायउतार व्हावे लागेल, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप सरकारवर केली.
रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर घणाघात केला. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, तेल यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेर वाढविले आहेत. यामुळे जनता भाजपवर नाराज असून येत्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत याची प्रचिती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, सतीश जारकीहोळी हे मागील 25 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी जात, भेद बाजूला ठेऊन संत बसवेश्वर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांच्या तत्वांचा अंगिकार केला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे खर्गे यांनी सांगितले. यावेळी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्यासह काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती.