सर्व दस्तऐवजांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने कोरोना संकटादरम्यान सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत वाहनाशी संबंधित रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), प्रदूषण प्रमाणपत्र यासारख्या दस्तऐवजांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुदत संपुष्टात येणाऱया दस्तऐवजांचे नुतनीकरण करण्यासाठी मोठा वेळ मिळणार आहे.
31 डिसेंबर 2020 पर्यंत या दस्तऐवजांचे नुतनीकरण करता येणार आहे. सरकारने मुदत संपुष्टात येणाऱया वाहन चालविण्याच्या परवान्याची वैधताही 31 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.
टाळेबंदीदरम्यान मुदत संपुष्टात आलेला वाहन चालविण्याचा परवाना, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, परवाना आणि अन्य दस्तऐवजांची वैधता 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय यापूर्वी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला होता. जूनमध्येही संकट कायम राहिल्याने सरकारने ही मुदत आणखीन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. दस्तऐवजांना 30 सप्टेंबरपर्यंत वैध मानण्याचा आदेश मंत्रालयाने काढला होता. केंद्र सरकारने संसर्ग फैलावण्यापासून रोखण्यासाठी कुठल्याही एका ठिकाणी, कार्यालयांमध्ये गर्दी न करण्याचे निर्देश दिले आहेत.