जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
कोल्हापूर / प्रतिनिधी
केंद्र सरकारने 9 डिसेंबर रोजी लेखी पत्र देवून दिल्लीत वर्षभर सुरु असलेले शेतकऱयांचे आंदोलन मागे घ्यायला लावले. पण सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. हा देशातील शेतकऱयांचा विश्वासघात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या कोल्हापूर जिल्हा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 31 जानेवारी 2022 रोजी सर्वत्र देशभर शेतकऱयांच्या वतीने विश्वासघात दिवस जाहीर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
किसान सभेचे जिल्हा सचिव नामदेव पाटील म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱयांना आंदोलन मागे घेताना आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गुन्हे मागे घेण्यासाठी अजून देखील सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने शेतकऱयांच्या अंगावर गाडी घालून पाच शेतकऱयांना चिरडले. परंतु सरकारने त्या मंत्र्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सरकारने शेतकरी विरोधातील काळे कायदे मागे घेतले. परंतु किमान हमीभाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. आंदोलनातील शहीदांच्या वारसांना मदतही दिली नाही. हा शेतकऱयांचा विश्वासघात आहे. त्यामुळे शेतकरी या विश्वासघाताच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष वाय.एन. पाटील म्हणाले केंद्र सरकारच्या विरोधात मोठा संघर्ष उभा केला जाईल. निदर्शनात रघुनाथ कांबळे, वाय. एन. पाटील, नामदेव पाटील, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, दिनकर सूर्यवंशी, बाळू पाटील, मारुती नलवडे, रुपाली पवार, दिलदार मुजावर, उत्कर्ष पवार, सर्जेराव कोपार्डेकर, दस्तगीर मुल्ला आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.