नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात मोठ्या संख्येने कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी तसेच लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे देशात बहुतांश नागरिकांच्या रोजगारावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टीचा विचार करुन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून देशातील जवळपास 80 कोटी लोकांना दोन महिन्यांसाठी मोफत राशन दिले जाणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
मागील वर्षी लॉकडाऊन लागू केल्यानंतर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली होती. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. त्यामुळे याच योजनेंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळणार आहे. या वर्षीच्या मे आणि जून अशा एकूण दोन महिन्यांमध्ये लाभार्त्यांना 5 किलो धान्य मोफत मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एकूण 26 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.