ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे पण आपण सर्वांनी नियम पाळले तर परिस्थितीसुधारेल. तसेच या संकटाचा नकारात्मक विचार सोडा आणि सामना करा असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा काळजी घ्या आणि अजिबात घराबाहेर पडू नका असे आवाहन जनेतेला केले आहे.
शरद पवार यांंनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे, त्यामुळे केंद्र सरकारचे नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाश्चिमात्य देशांशी आपण आपली तुलना करणे योग्य नाही. तरी पण इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड मधील परिस्थिती चिंताजनक आहे. भारताची लोकसंख्या, राहणीमान पाहता आपल्या कडील परिस्थिती बरी आहे. पण समाधानकारक नाही असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे, मुंबई शहरात परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या परिसरात काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच हा संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पुणे, मुंबई शहर वगळता अन्य ठिकाणी व्यवहार सुरू करणं शक्य आहे. पण नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असं ही ते यावेळी म्हणाले.
पालघर मध्ये घडलेली घटना निषेधार्थ आहे. असे घडायला नको होते. पालघरवरून कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र निर्माण केले जात आहे. या घटनेवरून राजकारण करू नका. प्रकरण घडल्यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करत या हत्याकांडातील आरोपींना गजाआड केले आहे.
तसेच लॉक डाऊन मुळे देश, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असं ही त्यांनी यावेळी सांगितले.