ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबची निवडणूक जस-जशी जवळ येईल तशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप कॉग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. पण त्याला काँग्रेसही जशाच तसे उत्तर देत आहे. पंजाब निवडणुकीच्या आधी काँग्रेसने देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांचा पंजाबी भाषेतील एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी देखील आज भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचं राष्ट्रीयत्व ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या तत्वाचं आहे. यामुळे घटनात्मक संस्था कमकुवत होत आहेत अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे. पंजाबच्या जनतेला संबोधताना आज ते बोलत होते.
काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामाची जनतेला जाण आहे. भाजपने मात्र पीएम मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब लोक अधिक गरीब होत आहेत असा खेद मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.
भाजपवर निशाणा साधताना मनमोहन सिंग म्हणाले, सरकारने समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलून आपली परिस्थिती बदलत नाही. सत्य काहीही असो ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येते. मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण ते प्रत्यक्षात आणणं खूप अवघड असतं असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांच्या अर्थिक धोरणांवर मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे. “कोरोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक घडी विस्कटली, बेरोजगारी वाढली आणि महागाईत वाढ झाली, यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. गेली साडेसात वर्षे सरकार चालवल्यावर स्वतःच्या चुका कबुल करायला हे सरकार तयार नाहीये. उलट हे सरकार पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दोष देत आहे. इतिहासावर दोष ढकलत स्वतःच्या चुका या काही कमी होऊ शकत नाहीत. पंतप्रधान म्हणून मी बोलण्यापेक्षा कामावर भर दिला. राजकारणातील फायद्यासाठी देश दुभंगेल असं काही केलं नाही,” असं मनमोहन सिंह म्हणाले.
मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांचे थेट नाव न घेता विदेश नितीवर कडाडून हल्ला चढवला आहे. राजकारणी लोकांची गळाभेट घेत संबंध सुधारले जाऊ शकत नाही, ना आमंत्रण नसतांना जात थेट बिर्याणी खायला गेल्याने असं होत नाही असं सांगत नवाझ शरिफ भेट आणि पाकिस्तानशी असलेले संबंध यांवर मनमोहन सिंह यांनी भाष्य केलं आहे. भाजपा सरकारकडे आर्थिक धोरणाबाबत कुठलीही समज नाहीये. हा मुद्दा फक्त देशाबद्द्ल मर्यादीत नसून केंद्र सरकारची विदेश निती पण अयशस्वी ठरली आहे. चीन आपल्या सीमेवर येऊन बसला आहे आणि हा मुद्दा दाबवण्याचा प्रकार सुरु आहे असा घणाघात सिंह यांनी केला.
दरम्यान काँग्रेसचे पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चन्नी यांचे जोरदार समर्थन मनमोहन सिंह यांनी केले आहे. जनता काँग्रेसची चागंली कामे लक्षात ठेवते. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत जी घटना घडली आहे त्यावरुन भाजपा पंजाबच्या जनतेचा अपमान करत असल्याची टीका सिंह यांनी केली आहे.