ऑनलाईन टीम / पुणे :
केंद्र सरकारने परदेशातून दूध भुकटी आयात केल्यामुळे देशभर दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सांगत आहेत. मात्र, केंद्राने जूनपासून कधीही दूध भुकटी आयात केलेली नाही, करणारही नाही. माझे म्हणणे खोटे ठरले तर राजकारण सोडेन. पण, थोरतांचे म्हणणे खोटे ठरले तर मंत्री थोरात राजकारण सोडणार का? असे आव्हान माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी दिले आहे.
राज्यातील निवडक पत्रकारांशी झुमद्वारे संवाद साधताना खोत बोलत होते. खोत म्हणाले, राज्यातील काही मंत्री केंद्र सरकारला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकार दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे असंवेदनशीलपणे पाहत आहे. 50 हजार टन दूध भुकटी राज्यात शिल्लक असताना वर्षाला 500 टन दूध भुकटी गरोदर माता आणि मुलांना मोफत देणार हे म्हणणे म्हणजे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. यावर्षीचा साठा संपायला अशा रितीने दहा वर्षे लागतील मग सरकार अकराव्या वर्षी दूध उत्पादकांना भाव देणार आहे का? असा प्रश्नही खोत यांनी केला आहे.
राज्यात रोज एक कोटी तीस लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यापैकी केवळ दहा लाख लिटर दूध सरकार खरेदी करणार म्हणतात. हे दहा लाख लिटर सुद्धा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दूध संघातूनच घ्यायचे. मग त्यांनी आपला व्यवसाय सरकारी पैशातून वाचवायचा हा या नेत्यांचा डाव आहे, असेही ते म्हणाले.