शेतकरी संघटनांची मागणी – हुबळीत महामार्ग रोखून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
वार्ताहर/ हुबळी
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावीत, अशी मागणी करीत म्हादई-कळसा भांडुरा आंदोलक समन्वय समिती आणि शेतकरी संघटनांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी महामार्ग रोखून आंदोलन छेडण्यात आले. तालुक्यातील किरेसूरच्या मलप्रभा डाव्या कालव्याजवळील हुबळी-सोलापूर महामार्गावर सुमारे तासभर रास्तारोको करण्यात आला. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.
बेन्नूर, किरेसूर, हेबसूर, दुंदूर, शिशूविनहळ्ळी, इंगळहळ्ळी, शिरगुप्पी परिसरातील शेतकरी संघांनी आंदोलनात सहभागी झाले होते. काही शेतकऱयांनी समवेत ट्रक्टर, बैलगाडी घेऊन आले होते. दरम्यान, केंद्र सरकारविरोधात शेतकऱयांनी घोषणा दिल्या. यावेळी बोलताना समन्वर समितीचे संचालक अमृत इजारी यांनी, केंद्र सरकारने तात्काळ कृषी विरोधी कायदे मागे घ्यावीत. सर्व शेतकरी एकत्र असल्याचे दाखवून देण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी शनिवारी चक्काजामची हाक दिली होती. याला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार हुबळी, नवलगुंद भागातील शेतकऱयांनीही नवलगुंद महामार्ग रोखून दिल्लीतील शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी समन्वय समितीचे महेश पत्तार, शिवण्णा हुबळ्ळी, एन. एच. पाटील, सुरेश मुदरेड्डी, चंदुसाब नदाफ, महेश नावळ्ळी, प्रभू रायनगौडर, प्रभू होसमनी, भूपण्णा नलवडी, शीतल मलगावी, वेंकरेड्डी चिक्करड्डी, मंजु कंबळी, सीमु इनामती, प्रभू तिर्लापूर, व्ही. एच. नागावी, व्ही. एस. दाडीबावी, उमेश दाडीबावी, शंकरगौडा पाटील, अनंतगौडा पाटील, ईश्वर दाडीभावी, बसवण्णप्पा हुणसीमरद आदी उपस्थित होते.