ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात सध्या कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकाळात केंद्र सरकारकडून राज्यांना मदत केली जात होती. कोरोनावर लस उपलब्ध न झाल्यामुळे सोशल डिस्टन्शिंगबरोबरच मास्क वापरणे हा एकच उपाय होता. योग्य ती काळजी घेऊनही कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. असे असताना आता केंद्र सरकारने कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेे राज्यांचा आर्थिक भार वाढत आहे. या सर्व प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला या निर्णयावर पुर्नविचार करण्याची विनंती केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, आरटीपीसीआर टेस्ट किट’, पीपीई किट आणि N-95 मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, सध्या सर्वच राज्ये आज संकटात आहेत. त्यामुळं केंद्र सरकारने राज्यांना त्यांचे हक्काचे #GST चे पैसे देणे गरजेचे होते. पण ते देण्याऐवजी केंद्र सरकारने कर्ज घ्यायला सांगितले आणि आता तर कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा निर्णय घेतला. याला जबाबदारी घेणे म्हणत नाहीत. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा.