भर उन्हात लोटांगण घालत शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन : शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट झाल्याने गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
विद्युत विभागाचे खासगीकरण आणि शेतकऱयांविरोधात जाचक कायदे करणाऱया केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत शेतकऱयांनी केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले. कित्तूर चन्नम्मा चौकापासून भर उन्हात लोटांगण घालत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यावेळी पोलिसांनी शेतकऱयांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गोंधळ उडाला होता.
केंद्र सरकारने शेतकऱयांविरोधात जे जाचक कायदे अंमलात आणले आहेत, ते रद्द करावेत. विद्युत विभागाचे खासगीकरण करून खासगी कंपन्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप शेतकऱयांनी या निवेदनात केला आहे.
महात्मा गांधींनी इंग्रजांच्या विरोधात चलेजाव चळवळ उभारली. मात्र, केंद्रातील भाजप सरकार त्याच परदेशी कंपन्यांना विविध प्रकारच्या सवलती देत आहे. एकप्रकारे हा देशदोह असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे शेतकऱयांनी म्हटले.
शेतकऱयांचा मोर्चा असल्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्याप्पा मल्लापूर, राज्य संचालक गणेश इळगेर, भीमशी गडादी, कुबेर गाणगेर, महादेव मडिवाळ, राजू मरवे, रमेश मडिवाळ, बबन मालाई, सुभाष चौगुले, महादेव कुगजी, गोपाळ सोमनाचे, किरण सांबरेकर, परशराम पाटील, अनिल मन्नोळकर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न…
कॉर्पोरेट कंपन्यांना तसेच एमएनसी कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे देशातील शेतकरी हा भूमिहीन होणार आहे. त्यामुळे आता भाजप चलेजाव चळवळ उभारावी लागणार असल्याचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. त्यांनी अर्धनग्न होऊनच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.