ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एअर इंडियाच्या विक्रीनंतर खासगीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.
चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार मार्च 2022 पर्यंत देशभरातील आणखी 13 एअरपोर्टसचे खासगीकरण करणार आहे. या 13 एअरपोर्टसची यादी नुकतीच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन अंतर्गत एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या ताब्यातील 13 एअरपोर्ट खासगी गुंतवणूकदारांना विक्री केले जाणार आहेत. या 13 एअरपोर्टची यादीही तयार करण्यात आली असून, ती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मार्च 2022 पर्यंत ही एअरपोर्टस विक्री करण्याची टार्गेट सरकारने ठेवले आहे. निविदा प्रक्रिया या वर्षअखेर पूर्ण होईल. विक्री करण्यात येणारी ही एअरपोर्ट कोणती याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून या विमानतळांसाठी बोली लावली जाईल, अशी माहिती एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली.