मुख्यमंत्री चन्नी यांचा आपवर शाब्दिक हल्ला: अकाली-काँग्रेसच्या नेत्यांना तिकीट देत कुठला बदल घडविणार
पंजाबमध्ये मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते चरणजीत चन्नी यांनी आम आदमी पक्षावर मोठा राजकीय हल्ला चढविला आहे. चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेत चन्नी यांनी अरविंद केजरीवालांकडे कुठली जादूची कांडी आहे, जी वापरून ते अकाली दल आणि काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना तिकीट देत बदल घडविणार आहेत असे विधान पेले आहे. अन्य पक्षांमधून आलेल्या 50 जणांना आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहे. अरविंद केजरीवालांनी हे लोक कसे निष्कलंक झाले हे सांगावे असे चन्नी म्हणाले.
काँग्रेस नेते अमित मोंटू हे आता आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत. काँग्रेस सरकारमध्ये भरती मंडळाचे अध्यक्ष राहिलेले रमन बहल यांना आपने उमेदवारी दिली आहे. कादियांमधील आप उमेदवार जगरुप सिंह हे अकाली दलात होते. डेरा बाबा नानकमधील गुरदीप रंधावा आणि मजीठा येथील लाली मजीठिया यांनी यापूर्वी काँग्रेसमधून निवडणूक लढविली होती. अटारीमधून एडीसी जसविंदर सिंह यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर आपने उमेदवारी दिली. खेमकरनमधील आप उमेदवार स्वर्ण सिंह हे काँग्रेसमध्ये होते. भुलत्थ मतदारसंघातील आप उमेदवार रणजीत राणा हे काँग्रेसचे नेते राहिले असल्याचे म्हणत चन्नी यांनी आम आदमी पक्षाला लक्ष्य केले आहे.
आम आदमी पक्षाची पूर्ण प्रचारमोहीम ही असत्यावर सुरू आहे. भगवंत मान यांना बोलण्याची संधीच दिली जात नसल्याचे चित्र आहे. मान यांच्या निरक्षरतेमुळे पंजाबचे नुकसान होतेय. केजरीवाल त्यांना सोबत बसवून घेतात, परंतु बोलू देत नाहीत. शिक्षित असल्यास मान काही तरी बोलू शकले असते. त्यांना 12 वी उत्तीर्ण करण्यास 3 वर्षे लागली होती. केजरीवालांचे नाव आज देखील प्रचारात प्रथम असते. केजरीवाल हे पंजाबचे हित इच्छिणारे नसल्याचे चन्नी यांनी म्हटले आहे.