केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण, विधानाशी दर्शवली असहमती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाच्या तिसऱया उद्रेकाचा धोका असून हा उद्रेक लहान मुलांसाठी संकटाचा ठरू शकणार असल्याने आणि तो सिंगापूरमध्ये तयार झालेल्या असल्याने सिंगापूरहून येणाऱया विमानांवर बंदी घालावी, अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या विधानावर सिंगापूर या देशाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून जबाबदारीने बोला असे सुनावले आहे.
केजरीवाल यांचे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. भारतीय नेत्यांनी नीट माहिती घेऊन मग विधाने करावीत. सिंगापूरमध्ये कोरोनाचा कोणताही नव्या रुपातील विषाणू आढळून आलेला नाही. त्यामुळे आमच्या देशातून भारतात विमाने आल्याने भारतात कोरोनाचा नवा उद्रेक होईल असे विधान करणे निषेधार्ह आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू बी 1 617 2 हा भारतात निर्माण झाला असून तो जगभरात पसरला आहे, असाही आरोप सिंगापूरने केला आहे.
हे विधान भारताचे नव्हे
केजरीवाल यांनी केलेल्या विधानांचे समर्थन भारत सरकार करीत नाही. त्यांचे विधान हे भारत सरकारचे विधान नव्हे. सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत कोणीही बेजबाबदार विधाने करू नयेत. तसेच, भारताचे इतर देशांशी असलेले दीर्घकालीन सलोख्याचे संबंध बिघडतील असे वर्तन करू नये, असा इशारा भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला.
उच्चायुक्तांचे स्पष्टीकरण
केजरीवाल यांनी ट्विटरवरून कोरोनाच्या नव्या कथित सिंगापूर रुपासंबंधी संदेश प्रसारित केल्यानंतर त्वरित सिंगापूरने तेथील भारताच्या उच्चायुक्तांकडे निषेध व्यक्त केला. दिल्लीतील नेत्यांना कोरोनाच्या नव्या रुपांसंबंधी भाष्य करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया उच्चायुक्तांनी व्यक्त केली.