शेतकऱयांच्या आंदोलनाचे ‘आप’कडून जोरदार समर्थन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या तीन आठवडय़ांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली सरकारने आंदोलनाचे जोरदार समर्थन केले आहे. तसेच केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध केला. आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती आणि मोहिंदर गोयल यांनी सभागृहात कृषी कायद्यांच्या प्रति फाडल्या. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जोरदार विरोध दर्शवत कृषी कायद्यांच्या प्रति फाडल्या. शेतकऱयांच्या विरोधात असलेल्या या कायद्यांचा स्वीकार आम्ही करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनात सत्ताधारी आम आदमी पक्षाने आंदोलक शेतकऱयांचे जोरदार समर्थन केले आहे. केजरीवाल सरकारने दिल्ली विधानसभेत तिन्ही कृषी कायद्याविरोधात ठराव आणला आणि शेतकऱयांच्या मागण्यांचे समर्थन केले. देशातील शेतकऱयांच्या मागण्यांसोबत आम आदमी पक्ष ठामपणे उभा आहे, अशी स्पष्टोक्तीही केजरीवाल यांनी दिली आहे.