त्यांचेच सहकारी धर्मवीर गांधी यांचा आरोप
इतरांना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश करणारे आणि स्वतःही धर्मनिरपेक्ष असल्याचा आव आणणारे अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू कार्ड खेळत आहेत, असा आरोप त्यांचेच एकेकाळचे सहकारी धर्मवीर गांधी यांनी केला आहे. केजरीवाल यांनी पंजाबात हिंदू-शीख असे राजकारण करू नये. ते राज्याच्या मुळावर उठण्याची शक्मयता आहे. केजरीवाल यांनी निदान पंजाबला तरी धार्मिक राजकारणापासून मोकळे ठेवावे, असे आवाहनही गांधी यांनी केले आहे.
पंजाब हे संवेदनशील राज्य आहे. ऐंशीच्या दशकात येथे शीख फुटीरतावाद आणि दहशतवादी हिंसाचार उफाळून आला होता. नंतर कशीबशी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली. 1988 पासून राज्यात बऱयापैकी शांतता नांदत आहे. आता ही परिस्थिती राजकीय नेत्यांनी निवडणूक जिंकण्याच्या अट्टहासापोटी बदलू नये. तसे झाल्यास पुन्हा हिंसाचाराचा ज्वालामुखी उफाळून येईल आणि स्थिती सर्वांच्याच हाताबाहेर जाईल. सत्ता केवळ पाच वर्षांची असू शकते. पण परिस्थिती बिघडल्यास ती पूर्ववत करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असा इशाराही गांधी यांनी केजरीवाल यांच्यासह सर्व नेत्यांना दिला आहे.
प्रचाराचे स्वरुप चिंताजनक
पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख स्पर्धा असेल असे दिसून येते. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तसेच राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर दहशतवाद्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. असे आरोपही परिस्थिती बिघडवू शकतात. सर्वच राजकीय पक्षांनी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करण्याचा किंवा त्यांचा पाठिंबा निवडून येण्यासाठी घेण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे. याच स्पर्धेच्या राजकारणातून ऐंशीच्या दशकात पंजाबला दहशतवादाची लागण झाली होती. याची आठवणही गांधी यांनी करून दिली आहे.