राजकीय हालचालींना येणार वेग आरोप-प्रत्त्यारोपांसह घोषणाही होणार
प्रतिनिधी /पणजी
‘मिशन गोवा 2022’ साध्य करण्यासाठी येत्या सोमवारी दोन दिग्गज राजकीय नेते गोव्यात येत आहेत. त्यातील एक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व दुसरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दोन्ही नेते दोन दिवस गोव्यात मुक्काम करणार असल्याने राज्यात राजकीय हालचाली बऱयाच वेगात सुरू होणार आहेत. हे दोन्ही बलाढय़ नेते एकाच दिवशी येत असल्याने गोव्याचे राजकीय वातावरण सोमवारी बरेच तापणार आहे.
‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दुसऱयांदा येत्या सोमवारी मिशन गोवा-2022 च्या निमित्ताने आतापर्यंत केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोव्यात येत आहेत. आपल्या गोवा दौऱयात केजरीवाल हे अनेक नेत्यांच्या गाठीभेठी घेणार आहेत. गोवा विधानसभेत ‘आप’ला प्रवेश करण्याची प्रबळ इच्छा असून त्या दृष्टीकोनातून त्यांनी गोव्यात प्रयत्न चालविले आहेत.
महत्वाच्या घोषणांची शक्यता
सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस अरविंद केजरीवाल हे गोव्यात असतील. आणि ते काही महत्त्वाच्या घोषणा देखील करणार आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी जेव्हा केजरीवाल गोव्यात आले होते व दिल्लीत परतण्यापूर्वी गोव्यात जनतेला 300 वीज युनिट दरमहा मोफत देण्याच्या त्यांच्या घोषणेने भाजपला अस्वस्थ करून टाकले. त्यानंतर भाजपने 16 हजार लिटर मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले आणि 1 सप्टेंबरपासून अंमलबजावणी देखील केली. नव्या दौऱयात केजरीवाल कोणती घोषणा करतील, याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहील.
फडणवीसांचे मिशन गोवा
सत्ताधारी भाजपची सत्वपरीक्षा येत्या निवडणुकीत आहे. भाजपला पुन्हा सत्ता गाठायची आहे. भाजप गोव्यात रुजल्यापासून मनोहर पर्रीकर हे एक प्रभावी नेते होते. त्यांनी शुन्यापासून 4 आमदार, नंतर 10 आमदार झाले. पुढील निवडणुकीत 17 आमदार, त्यानंतरच्या निवडणुकीत 14 व त्या पुढील म्हणजे 2012 मध्ये पूर्ण 21 जणांचे बहुमत मिळविले होते. 2017 मध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला केवळ 13 आमदारांचे बळ प्राप्त झाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला फडणवीस
पर्रीकरांच्या अनुपस्थितीत गोव्यातही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिमतीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे फर्डे वक्ते देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. त्यांची गोवा निवडणुकीसाठी नियुक्ती केल्यानंतर ते दि. 20 रोजी गोव्यात येत आहेत. दि. 21 रोजी पुन्हा मुंबईला परतण्यापूर्वी पणजीत ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
भाजपचे ‘मिशन 22 जागा’ फडणवीस यांच्यासमोर भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देणे हे एक फार मोठे आव्हान आहे. सत्ताधारी पक्षाबाबत जनतेत असलेली खदखद, त्यातच पक्षांतर्गत संभाव्य बंडखोरी या पार्श्वभूमीवर फडणवीस हे गोव्यात आल्यानंतर मंत्री, आमदार, भाजपची गाभा समितीबरोबर चर्चा करणार आहेत. ‘मिशन 2022 मध्ये 22’ हा भाजपचा संकल्प आहे. तो पूर्ण करणे हे फडणवीस यांच्यासमोरचे खरे आव्हान आहे.