सांत आंद्रे, शिरोडय़ात घरोघरी प्रचार, सर्वत्र उत्साहात स्वागत, उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी/ पणजी
दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे शनिवारी गोव्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री. केजरीवाल यांनी सांत आंदे आणि शिरोडा या मतदारसंघात पक्षाच्या स्थानिक उमेदवारांसह घरोघरी प्रचारात सहभाग घेतला. दोन्ही मतदारसंघात लोकांचा त्यांना उदंड प्रतिसाद लाभला.
14 फेब्रुवारी रोजी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी श्री. केजरीवाल शनिवारी दुपारी गोव्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सांत आंदेचे उमेदवार रामराव वाघ यांच्या प्रचारात सहभाग घेतला. त्यावेळी राज्य संयोजक राहुल म्हांबरे, ऍड. अमित पालेकर आदी नेत्यांची उपस्थिती होती. एका राज्याचा मुख्यमंत्री आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या घरी येतो याचा अनुभव प्रथमच घेणाऱया नागरिकांनी मोठय़ा उत्साहात तसेच पुष्पवर्षाव करून केजरीवाल यांचे स्वागत केले.
श्री. केजरीवाल यांनी त्यानंतर आपचे उमेदवार महादेव नाईक आणि इतर नेत्यांसह शिरोडा येथे घरोघरी प्रचार केला. त्यादरम्यान त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि राज्यात ‘आप’ची सत्ता आल्यावर सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱयांना मतदारांनी बदलावे
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले की, त्यांनी केवळ स्वार्थासाठी काम केले आहे. ‘गोव्यातील तरुणांना सर्वाधिक बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. ज्यांच्याकडे आधीच पैसा आणि राजकीय कनेक्शन आहे, त्यांनाच सरकारी नोकऱया मिळतात. दुसऱया बाजूने कोटय़वधी रुपयांसाठी पक्ष बदलणाऱया राजकारण्यांना मतदार कंटाळले आहेत. त्यामुळे यावेळी गोमंतकीयांनी ‘आप’ला संधी द्यावी, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, अनेक राष्ट्रीय पक्ष रिंगणात असताना आपच्या निवडणुकीच्या भवितव्याबद्दल विचारले असता, मतदारांचा ‘आप’वर विश्वास असल्याचे केजरीवाल म्हणाले. आपच आपले प्रश्न सोडवेल याची त्यांना खात्री आहे. त्याशिवाय मोफत आणि विनाखंडित वीजपुरवठा, बेरोजगारी भत्ता, स्थानिकांसाठी नोकरीत आरक्षण, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये आणि गृह आधार भत्ता 2500 रुपये यांसह आम्ही जाहीर केलेल्या सर्व हमी पूर्ण केल्या जातील, अस केजरीवाल म्हणाले.
शिरोडय़ात केजरीवाल मॉडेलला पाठिंबा
शिरोडय़ातही लोकांनी आप आणि केजरीवाल मॉडेलला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. भाजप सरकारने सामान्य गोमंतकीयांना कसे अपयशी केले त्याचे अनेक दाखले रहिवाशांनी दिले. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची सर्वसामान्यांची तक्रार होती. यामुळे मोठय़ा प्रमाणात गोव्यात संतप्त वातावरण आहे, असे सांगण्यात आले.
बहुजन समाजात भाजपबद्दल नाराजी
तरुणांना नोकऱया मिळत नसल्याने बहुजन समाजातही नाराजी आहे. प्रत्येकवेळी भाजपचे नेते बहुजन तरुणांसमोर येतात आणि त्यांना नोकरीची खोटी आश्वासने देतात. ती कधीच पूर्ण होत नाहीत. अनेक वर्षांच्या विश्वासघातानंतर गोमंतकीयांना आता समजून चुकले आहे की केवळ ‘आप’च त्यांना योग्य ते भविष्य देऊ शकते, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.