ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोना रुग्णांचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढील एक आठवड्यासाठी दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्याचा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दिल्लीच्या सीमा त्यापुढेही इतर राज्यातील रुग्णांसाठी खुल्या करायच्या का? याबाबत दिल्ली सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.
दिल्लीवासियांना याबाबतचे आपले मत येत्या शुक्रवारी पाच वाजेपर्यंत द्यायचे आहे. त्यानंतर दिल्ली सरकार यापुढे काय करायचे, याबाबत निर्णय घेणार आहे.
या बाबत आज पत्रकार परिषदेमध्ये बोलाताना केजरीवाल म्हणाले, मागच्या वेळी देखील मी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या, त्यावेळी देखील 5 लाख पेक्षा अधिक लोकांनी आपले मत पाठवले होते. यावेळी देखील आम्हाला तुमचे मत आवश्यक आहे. असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, पुढील आठवड्यात दिल्लीच्या सीमा बंद असल्याने, आता नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद या शहरातून दिल्लीस येण्यास प्रवेश मिळणार नाही. मात्र, ज्यांच्याकडे पास असेल त्यांना अत्यावश्यक कामासाठी दिल्लीत प्रवेश मिळेल. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.