तीन लाखापर्यंतच्या बिनव्याजी पिककर्जासह तंत्रज्ञानात घेतली गरुडभरारी
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि 5 रोजी होणार आहे. कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डमध्ये श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे.
पाच वर्षांपूर्वी अडचणीत असलेल्या बँकेला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व काटकसरीने कारभार करत संचालक मंडळांने या बँकेला गतवैभव मिळवून देत प्रगतिपथावर आणले आहे.
गेल्या पाच वर्षात विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाने अनेक महत्वाचे निर्णय घेत आणि धोरणे अवलंबत मगच बँकेनेही गरुडभरारी घेतली आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांसह संचालक मंडळातील कुणीही एकही गाडी वापरली नाही. तसेच बँकेच्या खर्चाने एकही दौरा केला नाही. गेल्या पाच वर्षात झालेल्या दोन अभ्यास दौऱ्याचा खर्च अध्यक्षनी स्वतःचे विमान खर्च स्वतः केला. तसेच उर्वरित संचालकांनी ज्याचा त्याचा खर्च स्वतःच केला. अगदी अध्यक्षांसह संचालकांनाही गाडी, फोन, पी. ए., तसेच शिपाई सुद्धा या सोयीसुविधाही कोणीही घेतल्या नाहीत. विमानाच्या तिकिटाचा भत्ता नाही की कोणत्याही हॉटेलमधून पाहुणचार नाही.
हे सगळं करीत असताना संस्था जगल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत या भावनेतून राजकारण विरहित कारभार केला. तसेच अडचणीतील संस्थांना बाहेर काढण्याचाही प्रामाणिक प्रयत्न संचालक मंडळाकडून झाला.
प्रशासक काळानंतर पाच वर्षांपूर्वी आलेल्या संचालक मंडळासमोर कर्ज वसुलीचे फार मोठे आव्हान आवासून उभे होते. यावर इलाज म्हणून कर्ज प्रकरण ओटीएस करीत थकबाकी वसुलीला हात घातला. अगदी नाईलाजास्तव गांधीगिरीच्या मार्गाने सनई चौघडा, ढोल ताशाच्या गजरात संचालक मंडळाने कर्जदारांच्या दारात ठिय्या मांडला आणि यातूनच उच्चांकी कर्जवसुली झाली.
प्रशासक मंडळ जाऊन पाच वर्षांपूर्वी विद्यमान संचालक मंडळ सत्तेत आल्यावर एकशे सात कोटींचा संचित तोटा होता. तो भरून काढून आज १३७ कोटीहून अधिक ढोबळ नफ्याच्या प्रगतीपथावर बँक आणली. पाच वर्षांपूर्वी असलेल्या अडीच हजार कोटी ठेवी वरून आज बँक साडेसहा हजार कोटींच्या ठेवींच्या यशस्वी टप्प्यावर पोहोचली आहे. बँकेचे अध्यक्ष या नात्याने ग्रामविकास मुश्रीफ यांचे 10, 000 कोटी ठेवींचे व दोनशे कोटी रुपये नफाचे उद्दिष्ट आहे. पारंपारिक कृषी क्षेत्राशी निगडित कर्जपुरवठा याबरोबरच बँकेने गेल्या पाच वर्षात सॉफ्ट लोन, साखर तारण बफर स्टॉक, साखर निर्यात अनुदानापोटी कर्ज, कारखाना उभारणी मध्यम मुदत कर्ज, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून प्राप्त लेटर ऑफ इंटेट कर्ज यासह सूतगिरण्यांना कर्ज अशा नवीन कर्ज धोरण घेतली.
1998 साली सहकार क्षेत्रातील एटीएम सुरू करणारी पहिली बँक म्हणून लौकिक मिळवणार्या या बँकेने पुढे मायक्रो एटीएम मशीन, मोबाइल बँकिंग, मोबाईल व्हॅन, यु पी आय सुविधा करीत ई-लॉबी सारख्या अद्ययावत सुविधांचा व स्वतःच्या डाटा सेंटर अविष्कार असे क्रांतिकारक पाऊल टाकले.
जिल्ह्यातील २ लाख, ५२ हजार, २१० शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे अपघाती विमा सुरक्षाकवच लागू केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बँकेने जिल्ह्यात एकूण १,८६० संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच म्हणजे १,०२१ गट सचिवांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून पाच लाखांचा जीवन विमा व आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या माध्यमातून दोन लाखांचा वैद्यकीय विमा योजना लागू केली. तसेच कोरोना महामारीने मृत्युमुखी पडलेल्या गट सचिवांच्या वारसदारांना सानुग्रह अनुदानही दिले. बँकेच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू झाल्यास २१ लाख रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास २२ लाख रुपये व इतर कोणत्याही अगर नैसर्गिक कारणांने मृत्यू झाल्यास १६ लाख रुपये विमा सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना बँकेने लागू केली आहे. तसेच या संचालक मंडळाच्या कारकीर्दीतच कर्मचाऱ्यांना बोनस व सभासद संस्थाना लाभांश वाटप ही सुरू झाले.
तीन लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी
केडीसीसी बँकेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख, ५२ हजार, २५२ शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज देणेबाबत बँकेच्या संचालक मंडळाकडे शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीला अनुसरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीककर्ज देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला. जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, महापूर, कोरोना आणि अपात्र कर्जमाफी या कारणांमुळे अडचणीत आलेला होता. म्हणून, बँकेने आपल्या उत्पन्नातून दोन टक्के व्याज सूट देऊन सर्व शेतकऱ्यांना शून्य टक्के म्हणजेच बिनव्याजी पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे . या निर्णयाची घोषणा बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अलीकडेच एका खास कार्यक्रमात केली.