वार्ताहर/ किणये
क्रांती फौंडेशनच्यावतीने केदनूर गावात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात महिला सशक्तीकरण, महिला बचत गट व सरकारकडून महिलांसाठी मिळणाऱया विविध योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्याला प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या राज्य सेक्रेटरी प्रमोदा हजारे उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील महिलांसाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांशी गावामधील महिलांना योग्य माहिती दिली जात नाही किंवा महिलापर्यंत योजनाच पोहोचत नाहीत. यासाठी आता सर्व महिलांनी स्वत:हून पुढे यायला हवे, असे हजारे यांनी सांगितले.
महिला एकत्रित आल्यास महिलांना हक्क मिळविणे सोपे होते. तसेच महिला संघटना व महिला मोर्चाद्वारे भागातील कोणतीही समस्या मार्गी लागू शकते, असे बळवंत लोहार यांनी मनोगत व्यक्त केले.
क्रांती फौंडेशनचे अध्यक्ष शिवप्रसाद पाटील, उपाध्यक्ष गिरीधर पाटील, परशराम झंगरुचे, यल्लाप्पा झंगरुचे आदींचीही भाषणे झाली. महिला मंडळाच्या अध्यक्षा सिंधुबाई कोतेकर यांच्यासह गावातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.