पंतप्रधान मोदींचा दौरा -महापुरानंतर केदारनाथ अधिक जोमाने राहिले उभे
वृत्तसंस्था / केदारनाथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पवित्र केदारनाथ धामचा दौरा केला आहे. तेथे त्यांनी गर्भगृहात सुमारे 15 मिनिटांपर्यंत पूजन केले आणि मग मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. पंतप्रधान मोदींनी आदि गुरु शंकराचार्य यांच्या समाधी स्थळावर निर्माण करण्यात आलेल्या त्यांच्या पुतळय़ाचे अनावरण केले आहे. हा पुतळा 15 फूट लांबीचा आणि 35 टन वजनाचा आहे.
केदारनाथ धाममध्ये पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण केले आहे. त्यानंतर ‘जय बाबा केदार’च्या उद्घोषासह पंतप्रधानांनी स्वतःचे संबोधन सुरू केले. मोदींनी संबोधनादरम्यान 2013 मध्ये केदारनाथ येथे आलेल्या पूरसंकटाचा उल्लेख केला. पुढील दशक उत्तराखंडचे असून येथील पर्यटन मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्याचे मोदी म्हणाले.
स्वतःच्या डोळय़ांनी पाहिला विध्वंस
कित्येक वर्षांपूर्वी जे नुकसान येथे झाले, ते अकल्पनीय होते. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि स्वतःला येथे येण्यापासून रोखू शकलो नाही, स्वतःच्या डोळय़ांनी येथील विध्वंस पाहिला होता. आमचे केदारनाथ धाम पुन्हा उभे राहिल का असा विचार लोकांच्या मनात यायचा? परंतु माझे अंतर्मन केदारनाथ पुन्हा अधिक जोमाने उभे राहणार असे सांगत होते. हे विकासकार्य ईश्वराच्या कृपेने झाल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
पाणी अन् तारुण्य
पर्वतीय क्षेत्रातील पाणी आणि तारुण्य पर्वतीय क्षेत्राच्या उपयोगी पडत नसल्याचे म्हटले जायचे. पण येथील पाणी आणि तारुण्य दोन्ही गोष्टी याच क्षेत्राकरता वापरल्या जातील हे निश्चित केले आहे. उत्तराखंडमधून पलायन रोखायचे आहे. भाविकांच्या सुविधेसाठी उत्तराखंडमध्ये चारही धामांशी रस्ते संपर्क आणि हेमकुंड साहिबनजीक रोपवेसह अनेक पायाभूत कामांची योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तीर्थस्थळांची यात्रा, फेरफटका नव्हे
आजच्या काळात आदि शंकराचार्यांचा सिद्धांत अधिकच प्रासंगिक झाल्याचे मी मानतो. आमच्या येथे तीर्थस्थळांची यात्रा, तीर्थाटनाला जीवनकाळाचा हिस्सा मानण्यात आले आहे. हा आमच्यासाठी केवळ फेरफटका नाही. हे भारताचे दर्शन घडविणारी जिवंत परंपरा आहे. जीवनात एकदा तरी चारधामची यात्रा करावी, गंगेत स्थान करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते असे त्यांनी नमूद पेले आहे.
काशीचाही कायापालट
अयोध्येला त्याचा गौरव शतकांनंतर मिळतोय. उत्तरप्रदेशात काशीचाही कायापालट होतोय. भगवान बुद्ध अन् भगवान रामाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचे काम सुरू आहे. आमचा देश स्वतःच्या भविष्यासाठी नवे संकल्प घेत आहे. या संकल्पांना आम्ही आदि शंकराचार्य यांच्या अत्यंत मोठय़ा परंपरेच्या स्वरुपात पाहू शकतो. देश आता स्वतःसाठी अत्यंत अवघड लक्ष्य निश्चित करतो. कालमर्यादेत बांधून भयभीत होणे आता भारताला मान्य नसल्याचे मोदी म्हणाले.
वाघांबर वस्त्र अर्पण
पंतप्रधानांनी केदारनाथ धाममध्ये वाघांबर वस्त्र अर्पण केले आहे. श्री आदि शंकराचार्य यांच्या पुतळय़ाच्या निर्मितीसाठी 18 मॉडेल तयार करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या सहमतीनंतर यातील एक मॉडेल निवडण्यात आले. कर्नाटकातील म्हैसूरचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी हा पुतळा ब्लॅकस्टोनद्वारे तयार केला आहे. याचे कार्य मागील वर्षी सुरू झाले होते.