वार्ताहर/ केपे
केपे पालिका क्षेत्रात वीज खात्याच्या भूमिगत वीजवाहिन्यांत बिघाड झाल्याने सोमवारी रात्री सात तास वीज गायब होऊन लोकांची रात्रभर झोप उडाली. सध्या उकाडा इतका वाढला आहे की, घरातून बाहेर पडणे लोक टाळत असतात. घरात राहणे सुद्धा पंखे व एसीशिवाय अवघड होत असते. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी तासन्तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने लोकांचे हाल झाले.
केपे पालिका क्षेत्रात सोमवारी रात्री 10 च्या दरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला व त्यानंतर रात्रभर केपे पालिका क्षेत्राबरोबर इतर भागांतही वीज गायब होऊन लोकांना रात्र जागवावी लागली. केपे पालिकेच्या बहुतेक भागांत आता भूमिगत वीजवाहिनी कार्यान्वित केली असल्याने गेल्या काही वर्षांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमी झाले आहेत. मात्र सोमवारी रात्री सेंट फ्रान्सिस भागातून येणाऱया भूमिगत वीजवाहिनीत बिघाड होण्याचा प्रकार घडला व रात्रीची वेळ असल्याने तसेच भूमिगत वीजवाहिनीचे दुरुस्तीकाम एजन्सीद्वारे केले जात असल्याने बिघाड शोधण्यात वीज खात्याच्या कर्मचाऱयांना रात्रभर बरीच कसरत करावी लागली.
पहाटे वीजपुरवठा सुरळीत
यानंतर 4 च्या दरम्यान बिघाड कुठे झाला होता ते कळून पहाटे 5 च्या दरम्यान जुन्या वीजवाहिनीच्या आधारे तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. पर्यायी व्यवस्था नसल्याने गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच रात्रभर केपेवासियांना विजेशिवाय राहावे लागले. वीज खात्यातर्फे भूमिगत वीजवाहिन्यांचे काम एका एजन्सीला दिले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे तंत्रज्ञ व सामग्री सदर एजन्सीकडे असल्याने वीज खात्याच्या कर्मचाऱयांना अशा वाहिन्यांत बिघाड झाल्यानंतर बराच घाम गाळावा लागतो.
आज एजन्सी करणार दुरुस्ती
रात्रभर बिघाड शोधण्यासाठी धावपळ करावी लागल्यानंतर वीज खात्याच्या कर्मचाऱयांना पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुन्हा मंगळवारी सकाळी काही तास वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यानंतर जेथे बिघाड झालेला आहे तो भाग वगळून तिथल्याच जुन्या वीजखांबावरून केपे भागात दुपारपर्यंत पुरवठा तात्पुरता सुरळीत करण्यात आला. भूमिगत वीजवाहिन्यांत जो बिघाड झाला आहे तो एजन्सीद्वारे आज दुरुस्त करण्यात येणार आहे. भूमिगत वीजवाहिन्यांत बिघाड येऊन पुरवठा खंडित होण्याचा प्रकार केपेच पहिल्यांदाच घडला आहे.
नागरिक संतप्त
तासन्तास वीज गायब राहिल्याने केपेतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जेव्हा वीजपुरवठा खंडित झाला तेव्हा वीज खात्याच्या अधिकाऱयांना फोन करून आढावा घेतला तसेच केबलमधील बिघाड जेथे शोधला जात होता त्या जागेवर मी गेलो. वीज खात्याच्या कर्मचाऱयांनी चांगलेच काम केले असले, तरी एक बिघाड शोधण्यात इतका वेळ जाता कामा नये. पूर्वी वीजखांबांमुळे कोणतीही वाहिनी तुटली, तर वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागायचा. मात्र आता भूमिगत वीजवाहिन्या असल्याने मशिनद्वारे कुठे बिघाड आहे ते शोधून काढता येते. तरी असा प्रकार पुन्हा होऊ नये याकरिता वीज खात्याने लक्ष द्यावे व लोकांना होणारा त्रास दूर करावा, असे अझीम शेख यांनी सागितले. दरम्यान, केपे वीज विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.