हवामान विभागाकडून येलो अलर्ट
कोट्टायम : अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या कोट्टायम जिल्हय़ात गुरुवारी सकाळी अतिवृष्टी झाली आहे. तसेच हवामान विभागाने आगामी 15 मेपर्यंत केरळमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. विभागाने राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये येलो अलर्ट घोषित केला आहे. चालू वर्षात अरबी समुद्रातून पहिले चक्रीवादळ भारतात धडकू शकते. 16 मे रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाने मस्त्यविभागाला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा आणि नजीकच्या बंदरांवर परतण्याचा सल्ला सामील आहे. हवामान विभागानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून जो 16 मेपर्यंत चक्रीवादळात रुपांतरित होऊ शकतो.