ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने केरळमधील 14 जणांना बागराम तुरुंगातून सोडले. त्यानंतर हे सर्वजण इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान प्रांत (ISKP) या दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत. या केरळी लोकांनी 26 ऑगस्ट रोजी काबूलमधील तुर्कमेनिस्तान दूतावासाबाहेर स्फोट घडवून आणण्यासाठी कट रचला होता. मात्र, सुरक्षा दलांनी तो डाव हाणून पाडला.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 14 पैकी एका केरळी व्यक्तीने त्याच्या घरी संपर्क साधला, तर उर्वरित 13 जण अजूनही काबूलमधील इस्लामिक स्टेट ऑफ खुरासान प्रांत या दहशतवादी गटासोबत फरार आहेत. 2014 मध्ये इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया आणि लेवंत यांनी मोसुल ताब्यात घेतल्यानंतर मलप्पुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातील केरळी लोकांनी मध्यपूर्वेतील इस्लामिक स्टेट या जिहादी गटात सामील होण्यासाठी भारत सोडला. काही दहशतवाद्यांचे कुटुंबीय ISKPअंतर्गत स्थायिक होण्यासाठी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात पोहोचले.
दरम्यान, केरळी नागरिक दहशतवादी संघटनेत सामील झाल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर या संघटना करू शकतात, याची भीती भारताला आहे.