पुरात अडकली बस – भूस्खलनामध्ये 3 ठार, 5 जिल्हय़ांमध्ये रेड अलर्ट
तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमध्ये मुसळधार पावसानंतर 5 जिह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्टायम जिल्हय़ात प्लापल्ली येथे भूस्खलन होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 14 जण बेपत्ता आहेत. पावसाच्या या दणक्यानंतर कोट्टायम, पथनमथिट्टा, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. याशिवाय तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड या सात जिल्हय़ांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱया कमी दाबाच्या वाऱयांमुळे केरळच्या किनारपट्टीच्या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
केरळच्या बऱयाच भागात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता. पावसानंतर पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांसंबंधीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून घटनेत भीषणता असल्याचे दिसून येत आहे. पूरस्थितीनंतर रस्ते पाण्याने भरले असून अनेक लोक पुरात अडकले आहेत. कोट्टायम जिल्हय़ात अनेक वाहने पाण्यात अडकली असून एक बसही पाण्यातून वाहून जाता-जाता अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी नद्यांच्या पात्रात जाणे टाळावे. यासोबतच लोकांना अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनाद्वारे जारी केला आहे. सरकारने मच्छीमारांना शनिवारी आणि रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच किनारपट्टीच्या जिह्यांमध्ये 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 19 ऑक्टोबर रोजी पाऊस कमी होऊ शकतो.