ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळच्या इडुक्की जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे राजमलाई परिसरात भूस्खलन झाले. या ठिकाणी 70 ते 80 लोक वास्तव्यास होते. त्यामधील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांची सुटका करण्यात आली आहे. जखमी 12 जणांवर मुन्नारच्या टाटा जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
राजमलाई परिसर मुन्नार या पर्यटन शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. भूस्खलन झालेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या गावाला जोडणारा पूल पावसात वाहून गेला असल्याने तिथे पोहोचण्यात अडचणी येत आहेत. तसेच सतत सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारियाई विजयन यांनी बचाव आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेतली आहे. एनडीआरएफचे (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) एक पथक भूस्खलनाच्या ठिकाणी पोहोचले आहे. तसेच राज्य अग्निशमन दलाचे 50 सदस्यांचे विशेष टास्क फोर्स रात्रीच्या कामासाठीही सज्ज झाले आहे.